एका भव्य स्वप्नाची देदीप्यमान यशस्वी वाटचाल....


"१० फ़ेब्रुवारी १९२९ ही तारीख असलेला, निळ्या जाडसर कागदावर सोनेरी अक्षरात लिहिलेला परवाना हा माझ्या आयुष्यातील सर्वाधिक रोमांचित करणारा कागद आहे. तेवढा आनंद मला आजवर कोणत्याही कागदाने दिलेला नाही."
अशी एक छोटीशी नोंद त्या व्यक्तीने आपल्या डायरीत केली. भारत आणि ब्रह्मदेश यांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या ’फेडरेशन एरोनॉटीक इंटरनॅशनल' या संस्थेने दिलेला तो पहिला विमान चालक परवाना होता. त्या परवान्यावर नोंद होती.... "जहांगीर आर. डी. टाटा!"

लहानपणापासूनच वेग आणि हवाई उड्डाण याचे विलक्षण वेड असलेल्या या मनस्वी माणसासाठी निश्चितच ही घटना खूप आनंदाची आणि महत्त्वाची होती. इतरांचे काही माहीत नाही, पण "टाटा एअरलाईन्स" नामक जे.आर.डीं.च्या महत्त्वाकांक्षी स्वप्नाची ही मुहूर्तमेढ आहे हे जे.आर.डी.नी त्याच क्षणी पक्के केले असावे. कारण त्यानंतर तीनच महिन्यांनी जेआरडींनी इंग्लंडला जाऊन १२०० पौंडांचे आपले पहिले 'जिप्सी मॉथ' हे छोटेखानी विमान विकत घेतले. खरेतर त्यावेळी हे विमान उडवणे म्हणजे खरोखर खूपच धाडसाचे काम होते. कारण या विमानात तेव्हा फक्त दिशादर्शक म्हणून एक साधा लोखंडी कंपास, जमिनीपासून उंची मोजणारे एक अल्टीमीटर, इंजिनाच्या दर सेकंदाला होणार्‍या फेर्‍या (रिवोलुशन्स) मोजणारा एक मापक आणि विमानाचा वेगमापक एवढ्याच यंत्रणा / सोयी होत्या. संपर्क साधण्यासाठी वापरले जाणारे रेडियो किंवा विमान थांबवण्यासाठी वापरले जाणारे ब्रेक्स देखील नव्हते. विमान उतरताना जमिनीशी होणार्‍या घर्षणाने वेग कमी होऊन विमान आपोआपच थांबे आणि अशा विमानाने १९३० साली जेआरडींनी कराची ते लंडन असा प्रवास एकट्याने केला.
जेआरडींचे पहिले जिप्सी मॉथ...


नेहमीच भव्य दिव्य स्वप्ने पाहून ती सत्यात उतरवण्याची हिंमत दाखवणार्‍या जे.आर.डी. टाटा यांनी पाहिलेल्या आणि प्रत्यक्षात उतरवलेल्या एका महान स्वप्नाचा तो प्रारंभ होता. उत्तम वैमानिक होण्याबद्दल जेआरडींची स्वतःची अशी काही ठाम मते होती. एक उत्तम आणि सर्वोत्कृष्ट वैमानिक होण्यासाठी आवश्यक असते ती झटपट निर्णय घेण्याची क्षमता आणि स्थिर-शांत मानसिकता. वैमानिकाच्या प्रतिक्षिप्त क्रिया किती झटपट होतात यावर त्याचे अवघे यश अवलंबून असते. तुम्हाला योग्य वेळी, योग्य तो निर्णय क्षणाचाही विलंब न करता घेता यायला हवा, कारण अवकाशात एक छोटीशी चूक म्हणजे मृत्यूला आमंत्रण ठरलेले असते. वैमानिकाला अंतराचा अंदाज आणि दिशांची उत्तम माहिती असणे गरजेचे असते.

जेआरडी म्हणत, उड्डाण करताना काही चूक झालीच आणि तुमचा मार्ग जर भरकटला तर मनापेक्षा उपकरणांवर विश्वास ठेवा. कारण अशा अवस्थेत मने भरकटू शकतात, उपकरणे नाहीत. त्यांच्या या ठाम आणि अभ्यासू विचारांमुळेच जेआरडी भावी आयुष्यात एक यशस्वी आणि बुद्धिमान उद्योजक म्हणून यशस्वी ठरले.
जेआरडी : एक द्रष्टा उद्योजक
१९३० च्या दरम्यान जेआरडींची गाठ त्यांच्यासारख्याच एका महत्त्वाकांक्षी व्यक्तीशी झाली. 'रॉयल एअर फोर्स' या ब्रिटिश हवाईदलातील एक धाडसी वैमानिक श्री. नेव्हिल व्हिन्सेट आपले 'हविलॅंड' विमान घेऊन हवाई क्षेत्रातच उपजीविकेचे साधन शोधायचे म्हणून भारतात येऊन पोहोचला. भारतातील पहिला वैमानिक परवाना मिळवणार्‍या जेआरडींची त्याने भेट घेतली. त्यावेळी भारतातील हवाईसेवा जवळपास नव्हत्याच्या स्थितीत होती. भारतात एरियल फोटोग्राफी (आकाशातून भूभागाचे चित्रण) तसेच एरियल लँड सर्व्हेज (आकाशातून जमिनीचे सर्वेक्षण) करणे अशा महत्त्वाच्या कामासाठी भारतात हवाईसेवेचा उपयोग होऊ शकेल अशी कल्पना त्याने जेआरडी बरोबरच्या आपल्या भेटीत मांडली. त्यावेळी एका युरोपियन कंपनीने (इंपिरियल एअरवेज) लंडन ते कराची अशी टपालसेवा सुरू केली होती. ती पुढे कोलकाता आणि ऑस्ट्रेलिया अशी वाढवण्याचा कंपनीचा मानस होता. ही हवाई टपाल सेवा पुढे अहमदाबाद, मुंबई मार्गे चेन्नई (तत्कालीन मद्रास) आणि कोलंबोपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव नेव्हिल यांनी जेआरडींपुढे मांडला. मुळातच हवाई क्षेत्राचे प्रचंड आकर्षण असलेल्या जेआरडींनी टाटा सन्सच्या डायरेक्टर्स समोर हा प्रस्ताव मांडला आणि त्यांचा विरोध असतानाही श्री. दोराब टाटा यांच्या परवानगीने पासही करून घेतला. त्यानंतर लगेचच हा प्रस्ताव मंजुरीसाठी तत्कालीन सरकारकडे पाठवण्यात आला. पुढेमागे याचा उपयोग लष्करी कामासाठीही करता येईल अशी साखरपेरणीही करण्यात आली जेणेकरून सरकारकडून काही अडचण येऊ नये. सरकारकडे विमानखरेदीची परवानगी मागण्यात आली. तत्कालीन ब्रिटिश सरकारने नेहमीप्रमाणे खोडा घातलाच. दोन वर्षे सलग पाठपुरावा केल्यावर विमान खरेदीची परवानगी तर मिळाली पण काही अटींसहित. वैमानिक सर्व ब्रिटिशच असावेत आणि फक्त ब्रिटिश विमानेच वापरण्यात यावीत असा खोडा ब्रिटिश सरकारने घालून ठेवला होता. जेआरडींनी आपले सर्व कौशल्य पणाला लावत श्री. होमी भरुचा नामक वैमानिकाला आपल्या उपक्रमात सामील करून घेण्यात यश मिळवले. त्यानंतर लगेचच जेआरडींनी 'हविलँड' या ब्रिटिश विमान कंपनीकडून दोन विमाने खरेदी केली. खरेतर त्यातील एक विमान आकाशमार्गे स्वतःच चालवत आणायची जेआरडींची इच्छा होती. पण आजारपणामुळे ते शक्य झाले नाही आणि ही दोन्ही विमाने जलमार्गाने 'व्हिक्टोरिया' बोटीने भारतात आणण्यात आली. एक वैमानिक, मागे दोन माणसे आणि सर्वात मागे टपालाचे गट्ठे व इतर सामान ठेवण्याची जागा अशी ही विमाने होती. त्याकाळी भारतात फक्त कराची येथे विमानतळ होता. त्यामुळे मुंबईतील जुहू येथे टाटा एअरलाईन्सने आपला पहिला विमानतळ उभारण्याचे ठरवले. १५ सप्टेंबर १९३२ ही भारतीय हवाई टपालसेवेच्या उद्घाटनाची शुभारंभाची तारीख ठरवण्यात आली. पण अतिवृष्टीमुळे ही जुहूची प्रस्तावित जागा पाण्याखाली गेल्याने ही तारीख पुढे ढकलून १५ ऑक्टोबर करण्यात आली.

जुहूचा विमानतळ : जेआरडींच्या पहिल्या दोन प्रवासी-वाहक 'मर्लिन' जातीच्या विमानांसोबत !


त्या दिवशी पहाटे साडे सहा वाजता जेआरडींनी कराचीच्या विमानतळावरून टाटा एअरलाईन्सने सुरू केलेल्या भारतीय हवाई सेवेचे पहिले उड्डाण केले. पांढरे शुभ्र कपडे, एक वार्‍यापासुन संरक्षण करणारा चष्मा आणि कॅलक्युलेशनसाठी वापरला जाणारा एक स्लाईड रूल (हा जेआरडींसमवेत नेहमी असे) एवढ्या साहित्यासहित पत्रांची थैली सोबत घेऊन जेआरडींनी हवेत उड्डाण केले. ताशी शंभर मैल या वेगाने विमान चालवत अहमदाबादेत इंधन भरण्यासाठी म्हणून एक थांबा घेत दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी जेआरडी मुंबईत पोचले. स्वागतासाठी त्यांच्या पत्नी श्रीमती थेली (थेल्मा) विकाजी, टाटा सन्सचे काही अधिकारी आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. आपल्याजवळील साधारण पंचावन्न पौंडांची टपालाची थैली जेआरडींनी मुंबईच्या तत्कालीन पोस्ट मास्तर जनरल यांच्याकडे सुपूर्त केली. उरलेले टपाल घेऊन श्री. नेव्हिल विन्सेंट दुसर्‍या एका "पस मॉथ' जातीच्या विमानात बसून मद्रासला रवाना झाले. भारतातील हवाई टपालसेवेची ही यशस्वी सुरुवात होती. किंबहुना भारतातील एकूणच हवाई सेवेची ही यशस्वी सुरुवात होती.

टाटांचे डी हविलँड पस मॉथ
आपल्या पहिल्या यशस्वी टपालफेरीनंतर जुहू विमानतळावर उतरलेले जेआरडी आपल्या विमानासहित. डाव्या बाजूला वैमानिक श्री. होमी भरुचा आणि उजव्या बाजूला उभे श्री.  नेव्हिल विन्सेंट


दर शुक्रवारी संध्याकाळी लंडनहून इंपीरियल एअरवेजचे विमान कराचीला टपाल घेऊन येई व शनिवारी तिथून निघून पुढे टाटा एअरलाईन्सचे छोटे विमान ते टपाल अहमदाबाद, मुंबई, मद्रास असे वितरित करत परतीचे टपाल घेऊन मंगळवारी पुन्हा कराचीत दाखल होत असे. एखाद्या वेळेस जर लंडनहून येणारे विमान उशीरा आले तरच टाटांच्या सेवेला उशीर होत असे, अन्यथा टाटा एअरलाईन्स त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल सुप्रसिद्ध झाले होते. दर पावसाळ्यात जुहूचा विमानतळ पूर्णपणे पाण्याखाली जाई, तेव्हा हे विमान पुण्यातील येरवड्याजवळ उतरवण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. साधारण एक वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर ब्रिटिश सरकारकडून टाटा एअरलाईन्सला त्यांच्या उत्कृष्ट हवाई टपालसेवेबद्दल गौरवण्यात आले. यावेळी सरकारतर्फे देण्यात आलेल्या प्रशस्तिपत्रकात असे म्हणण्यात आले होते की "हवाई टपाल सेवा कशी असावी याचे टाटा सर्व्हिसेस हे उत्कृष्ट उदाहरण आहे. वक्तशीरपणा आणि प्रतिकूल हवामानातही योग्य आणि निर्दोष सेवा कशी द्यावी याचे प्रशिक्षण टाटा एअरलाईन्सकडून आमच्या अखत्यारीतील 'इंपिरियल एअरवेज'च्या कर्मचार्‍यांनी घ्यायला हवे."

आपल्या यशस्वी आणि आवडत्या विमानांसोबत काही आनंदाचे आणि अभिमानाचे कृतार्थ क्षण अनुभवताना जेआरडी.




पहिले पाऊल प्रचंड यशस्वी झाले होते. पहिल्या वर्षी या हवाई टपाल सेवेतून टाटा सन्सला दहा हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. पण कायम आकाशावर दृष्टी ठेवून असलेल्या जेआरडींनी हे यश विसरून कधीच पुढच्या पावलाच्या तयारीला सुरुवात केलेली होती. हवाई सेनेच्या शंभराव्या दिवशी झालेल्या एका सभेत जेआरडी म्हणतात "हवाईसेवेच्या भवितव्याबद्दल मला १००% खात्री आहे. आपण नक्कीच यशस्वी होऊ. पण जर ही हवाईसेवा खर्‍या अर्थाने कधी भरभराटीला येईल? तर, जेव्हा आपणा सर्वांना विमानाने जाणे सोयीचे वाटेल, आपली महत्त्वाची कागदपत्रे वेळेवर पोहोचावीत आणि ती हवाईसेवेने वेळेवर पोचतील असा विश्वास निर्माण होईल तेव्हा!"
जेआरडींनी आपल्या मनातल्या महत्त्वाकांक्षेचे यावेळी सर्वप्रथम सुतोवाच केले होते. साधारणतः हवाई सेवा यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. सर्वप्रथम ती प्रवासी वाहतूक सेवा असायला हवी. अन्यथा मिळणारे उत्पन्न गुंतवणुकीच्या तुलनेत खूप कमी असते. त्यानंतर इतर सर्व सोयी, उदा. सुसज्ज विमानतळ, अद्ययावत संदेशवहन यंत्रणा, जमिनीवरील अन्य सर्व सोयी या सरकारने करणे गरजेचे असते. इतर सर्व देशातील सरकारे या सर्व सुविधा आपल्या हवाई सेवा पुरवणार्‍या आस्थापनांना पुरवीत होत्या. फक्त भारतात मात्र ही सोय ब्रिटिश सरकारने दिली नव्हती. हा सगळा खर्च खाजगीरीत्या करणे खूप कठीण आणि आवाक्याबाहेरचे काम असते. तरीसुद्धा टाटांनी हा धोका पत्करला आणि टाटा एअरमेल सर्व्हिसेस यशस्वी करून दाखवली.

टाटा एअरमेल सर्व्हिसेसचा जाहिरात फलक
त्यावर्षी 'इंडियन नॅशनल एअरवेज' आणि 'इंडियन काँटीनेंटल एअरवेज' अशा दोन हवाई टपाल सेवा भारतात चालू झाल्या. टाटांनीही आपली क्षितिजे रुंदावली. आता कलकत्ता, नागपूर, जमशेदपूर तसेच हैदराबाद, गोवा, त्रिवेंद्रम, कन्ननौर ही ठिकाणेही टाटा एअरवेजच्या हवाईमार्गात सामील झाली. विशेष म्हणजे अजूनही विमानांसाठी मूलभूत सोयी नव्हत्याच. अजूनही साध्या कंपासच्या साह्याने दिशा ठरवली जात असे. अनुभवी विमानचालक जमिनीवरील खुणा ओळखून त्यानुसार मार्गक्रमण करीत होते. पण तरीही टाटा एअरवेजने आपली वेळ १००% पाळली.
पहिली काही वर्षे टपालसेवा जलद आणि व्यवस्थित चालावी यावर सगळे लक्ष केंद्रित करतानाच हळूहळू थोडी मोठी प्रवासी वाहतूक करता येईल अशी काही विमाने जेआरडींनी टाटाच्या सेवेत दाखल केली. त्यावेळेस विमानतळांवर पेट्रोल पंपाची सोय नसे. त्यामुळे बर्माशेलचे कर्मचारी पेट्रोलचे कॅन बैलगाडीत घालून घेऊन येत आणि हाताने विमानात इंधन भरले जाई. विमानासाठी धावपट्ट्या, विमानतळ, कार्यालय असे काहीही नव्हते. १९३६ पर्यंत विमानाचे पंखे फिरवण्यासाठी पहिला झटका हाताने स्टार्टर फिरवून द्यावा लागत असे. मग हळूहळू ऑटोमॅटिक स्टार्टर, अचूक दिशा दाखवणारा गायरो कंपास, उतारू आणि वैमानिकांसाठी वेगवेगळ्या स्वतंत्र केबिन अशा सोयी आल्या. पण विमानाच्या इंजिनाचा आवाज एवढा प्रचंड असे की प्रवाशांना आपापसात बोलताही येत नसे. पण नंतर हा आवाज कमी होत गेला. हळू हळू प्रवाशांची संख्या वाढत होती. पुढे दिल्ली ते मुंबई प्रवासी सेवा दिमाखात सुरू झाली. सगळीकडून प्रचंड प्रमाणात कौतुक होत होते. पण कौतुक जरी खूप असले तरी प्रत्यक्ष फायदा मात्र अत्यल्पच होता. इतका कमी फायदा असूनही जेआरडी, यात इतके स्वारस्य का घेतात याचे अगदी टाटा सन्सच्या लोकांनाही आश्चर्य वाटे. पण विमान उडवणे म्हणजे जेआरडींसाठी जीव की प्राण होते. मर्मबंधातली ठेवच जणू! हवाई टपालसेवा खरोखर खूप खडतर होती. वैमानिकांना स्वतः टपालाच्या पिशव्या उचलाव्या, उतरवाव्या लागत. पण १९३८ मध्ये सरकारने टपालसेवेचे क्षेत्र विस्तारले, व्यापक केले आणि त्या एका वर्षात कंपनीचा फायदा दसपटीने वाढला. हळूहळू टाटांच्या हवाईसेवेतील विमानांची संख्या आणि आकार वाढत होता. प्रवाशांची संख्या वाढायला लागली होती, टपाल चौपट झाले होते. टाटा एअरवेजच्या यशाची कमान पुढे कायम चढतीच राहिली.

टाटांनी सुरुवातीला घेतलेल्या विलॅंड कंपनीच्या दोन विमानापैकी हे लिओपार्ड मॉथ
याच दरम्यानची एक घटना जेआरडींच्या उच्च नैतिकतेची साक्ष देऊन जाते. टाटांची टपालसेवा श्री. नेव्हिल विन्सेंट यांच्याबरोबर भागीदारीत सुरू झालेली होती. त्यावेळी ठरल्यानुसार श्री. नेव्हिल व्हिन्सेंट हे फायद्यात १/३ हिश्शाचे वाटेकरी होते. पण नंतर कंपनीचा व्यवसाय वाढत गेला. भरभराट होत गेली तेव्हा कंपनीच्या (टाटा सन्स) डायरेक्टर्सनी हा करार बदलून घेण्याची मागणी केली आणि सर्वानुमते उचलून धरली. कारण आता प्रचंड वाढलेल्या नफ्यातील १/३ हिस्सा नेव्हिलना द्यायचे त्यांच्या जीवावर आले होते. शेवटी कंटाळून जाऊन अतिशय खेदाने नेव्हिल यांनी सांगितले की मला ठरल्याप्रमाणे नफ्याचा १/३ हिस्सा मिळायला हवा, अन्यथा आपण ही भागीदारीच बंद करून टाकू. जेआरडींनी मुंबईतील एक विख्यात वकील दीनशा दाजी यांचा सल्ला मागितला. त्यांनी सांगितले की कायद्याने तुम्ही नेव्हिलना १/३ फायदा देण्यास बांधील नाही, पण नैतिकदृष्ट्या विचार केला तर द्यायला हवा. तत्क्षणी जेआरडींनी नेव्हिलना कळवले की तुम्ही कंपनी सोडणार नाही आहात.
बोर्डावरील इतर सदस्यांनी केलेल्या विरोधाला उत्तर देताना जेआरडी म्हणाले...
" टाटांच्या सर्व उद्योगात नीतिमत्ता सर्वात वरच्या स्तरावर हवी आहे. दिलेला शब्द पाळणे हे माझे कर्तव्य होते. हे खरेतर त्याच दिवशी मी मान्य करायला हवे होते. ते मी केले नाही याबद्दल मला वाईट वाटतेय. ज्यावर आपला विश्वास आहे, जे आपल्या सदसद्विवेक बुद्धीला पटतेय त्यावर वेळ न घालवता पटकन निर्णय घ्यायला हवा हा धडा मी आज शिकलो आहे."

पुढे टाटांच्या अनेक उद्योगात फायद्यापेक्षा नीतिमत्तेला जास्त महत्त्व दिले गेले त्याचे श्रेय जेआरडींच्या या कृतीला जाते. पहिल्या पाच वर्षात पृथीच्या सहा प्रदक्षिणा पूर्ण होतील एवढा प्रवास टाटांच्या विमानांनी केला. वेळ पाळण्याची त्यांची टक्केवारी होती ९९.४%! पुढे दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी देशांतर्गत सर्व विमानसेवांचे नियंत्रण सरकारने आपल्या हातात घेतले. तेव्हाही रॉयल एअरफोर्स या ब्रिटिश हवाईदलाच्या ताफ्यात सामील होऊन टाटांनी अनेक प्रकारे लष्करी सेवा बजावली. सौदी अरेबिया, ओमान या शहरावरून इंग्लंडला जाण्याचा नवा मार्ग शोधला. पुण्याच्या लष्करी कारखान्यांमधून युद्धसामुग्रीची वाहतूक, जखमी सैनिकांना युद्ध आघाडीवरून सुखरूप रुग्णालयात पोचवणे अशी अनेक प्रकारे सेवा पार पाडली.

भारतात विमाननिर्मीतीचे कारखाने असावेत अशी जेआरडींची खूप इच्छा होती. त्यासाठी नेव्हिलच्या मदतीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते. सुरुवातीला परवानगीही मिळाली, पुण्याजवळ प्राथमिक कामही सुरू झाले, पण ब्रिटिश सरकारच्या स्वार्थी वृत्तीने परत उचल खाल्ली. भारतात जर अशी विमाने निर्माण व्हायला लागली तर पुढे आपल्यालाच स्पर्धा निर्माण होईल या भीतीने सरकारने ही परवानगी काढून घेतली. त्याऐवजी फक्त हलकी, कमी वजनाची, इंजिनाशिवाय उडणारी, फक्त युद्धात वापरता येणारी ग्लायडर्स बनवा असे सांगण्यात आले. जेआरडींनी याला नकार दिला. कारण युद्ध संपले की देशासाठी त्या ग्लायडर्सचा कसलाच उपयोग नव्हता. 

या दरम्यान जेआरडींचे मित्र आणि भागीदार श्री. नेव्हिल व्हिन्सेंट यांचाही एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्यानंतर सर फ्रेडरीक टीम्स हे टाटांच्या हवाईक्षेत्रात दाखल झाले. याच दरम्यान डॉ. एच. एम. वाडीया यांच्या नेतृत्वाखाली टाटांनी जुहूला वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्या आधी हे प्रशिक्षण घेण्यासाठी वैमानिकांना लंडनला जावे लागत असे. १९४५ साली युद्धसमाप्तीनंतर हवाईसेवा विस्तारण्याच्या नावाखाली जवळ जवळ अकरा कंपन्यांना सरकारने परवानगी दिली. तेव्हा खुद्द हवाई प्रवास मंत्र्यांनी "हवाईसेवेचे वाटोळे करण्याचा मुहूर्त झाला" असे म्हणत नाईलाजाने या निर्णयाचे स्वागत केले. १९४६ मध्ये भारतीय हवाई सेवेत टाटांच्या सेवेचा वाटा १/३ होता आणि बाकी २/३ उरलेल्या दहा कंपन्यांत विभागला गेला होता. पण आता जेआरडींची महत्त्वाकांक्षा एक नवे , उत्तुंग स्वप्न पाहायला लागली होती. आता जेआरडींच्या कर्तृत्वाला आंतरराष्ट्रीय क्षितिजाचे वेध लागले होते. अखेर जेआरडींनी "एअर इंडिया इंटरनॅशनल" या नावाने आपले स्वप्न सरकारसमोर मांडले. सरकार आणि टाटा सन्स यांच्या संयुक्त सहभागाने ही आंतरराष्ट्रीय हवाईसेवा सुरू होणार होती. एडी रिकेनबेकर यांनी म्हणून ठेवलंय " हवाई क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी तुम्ही थोडे चक्रमच असायला हवे आहे असे नाही, पण जर असाल तर बरेच आहे." टाटा एअरलाईन्सच्या प्रारंभीच्या जवळपास नुकसानीच्या काळातही जेआरडीनी दाखवलेल्या चिकाटीत त्यांचा द्रष्टेपणाच दिसून येतो. ज्यावेळी टाटा सन्सच्या सर्व पदाधिकार्‍यांनी टाटा एअरवेजला विरोध केला होता त्यावेळी एकटे जेआरडी आपल्या या स्वप्नाचा पाठपुरावा करत आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी नेव्हिल विन्सेंटच्या अनुभवांवर दाखवलेल्या विश्वासाला नेव्हिलनेही कधी तडा जाऊ दिला नाही. टाटा एअरवेजला जरासे स्थैर्य लाभले तेव्हाच नेव्हिलच्या साथीत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करायची तयारी जेआरडींनी सुरू केली होती. कारण भारत हा पर्यटन समृद्ध देश आहे. इथे जरा स्थैर्य आले की बाहेरचे संपन्न आणि श्रीमंत पाश्चिमात्य देश इथल्या पर्यटन क्षेत्रात, तसेच वाहतूक क्षेत्रात शिरकाव करण्याचा प्रयत्न करणार याची त्यांना खात्री होती. एकदा का त्यांचा इथे चंचुप्रवेश झाला की मग आपल्याला त्यांच्याशी स्पर्धा करणे अवघड जाईल हे जेआरडींनी कधीच ओळखले होते. बाहेरच्या कंपन्या आत येण्याआधीच या क्षेत्रात भारताने आपली जागा निर्माण करायला हवी असे जेआरडींचे ठाम मत होते.

१९४७ च्या दंगलीत देखील टाटांच्या हवाई सेवेने खूप महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याच संघर्षाच्या काळात टाटांनी सरकारपुढे आपली आंतरराष्ट्रीय हवाईसेवेची संकल्पना मांडली. खरेतर सरकारला स्वतःच आंतरराष्ट्रीय सेवा चालू करण्याची इच्छा होती. पण प्रारंभीच्या तयारीत २-३ वर्षे घालवणे म्हणजे तेवढ्या काळात वाढलेल्या स्पर्धेला तोंड देणे खूप कठीण जाणार होते. त्याउलट टाटांकडे सर्व काही तयार होते. विमाने, प्रशिक्षित वैमानिक, कर्मचारी, देशांतर्गत अनुभव अशा सर्व पायाभूत सुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टाटांचा भारतातील एकंदर हवाई प्रवाशांत असणारा बहुतांश (१/३) हिस्सा. हे सगळे समोर ठेवून अखेर सरकारने 'मुंबई ते लंडन' अशी प्रवासी हवाई सेवा चालू करण्याची परवानगी दिली. या प्रकल्पात सरकारचे ४९%, टाटांचे २६ % आणि इतर शेअर्सच्या स्वरूपात जनता असे भागभांडवल असणार होते. शेवटी ८ मार्च १९४८ ला 'एअर इंडिया' ची रीतसर स्थापना झाली आणि ८ जूनला पहिले उड्डाण ठरले. कंपनीचा राजदूत म्हणून, लोगो म्हणून निवडण्यात आला... लालबुंद शेरवानी घातलेला, मिस्कील चेहर्‍याचा, कंबरेत वाकलेला मिशाळ महाराजा! पुढे हा एअर इंडियाचा महाराजा लवकरच भारतीय आतिथ्याचे प्रतीक म्हणून छोट्या मूर्तीच्या रूपात घराघरात पोहोचला, प्रसिद्ध झाला.

एअर इंडियाचा "महाराजा"
८ जूनला मुंबईहून लंडनला उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या पहिल्या हवाई दूताचे नाव होते "मलबार प्रिन्सेस!" स्वतः जेआरडी , त्यांच्या पत्नी थेली, तसेच काही संस्थानिक आणि उद्योगपती असे काही प्रवासी घेऊन उड्डाण केलेल्या या विमानाने यशस्वीपणे लंडन गाठले.




जेआरडी टाटा पत्नी श्रीमती थेली यांच्या समवेत..


या यशस्वी प्रवासाने टाटांच्या शिरपेचात एक यशाचा नवा तुरा खोवला गेला.  जेआरडींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण या यशाने अजून एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली होती. आता एअर इंडियाची स्पर्धा थेट इंग्लंड - अमेरिकेसारख्या समृद्ध आणि विकसित देशांतील हवाईसेवांशी होणार होती. एक जेआरडी सोडले तर सरकारसहित इतर सगळ्यांच्याच मनात या साहसाबद्दल शंकेची पाल चुकचुकत होती. पण जेआरडीना यशाबद्दल कसलीही शंका नव्हती... ती त्यांच्या रक्तातच नव्हती. कायम आशावादी असणे, आपल्या निर्णयाबद्दल ठाम आत्मविश्वास असणे ही जेआरडींच्या यशस्वी कारकीर्दीची चावी होती.
आणि येणार्‍या काळाने जेआरडींचा आत्मविश्वास १००% खरा ठरवला. पुढची कित्येक वर्षे , किमान दोन दशके एअर इंडियाच्या प्रवाशांपैकी ७५% प्रवासी हे परदेशी नागरिक होते. त्यांच्या त्यांच्या देशाच्या स्वतःच्या अशा हवाई प्रवासी सेवा होत्या. तरीही त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याची किमया टाटांच्या 'एअर इंडिया'ने करून दाखवली. याला कारणीभूत होती टाटांची विचारधारा! "फायद्यापेक्षाही नीतिमत्ता नेहमी वरच्या स्तरावर असायला हवी" हा टाटांचा आग्रह या विश्वासाला कारणीभूत होता. विमानांची संख्या आणि अत्याधुनिक सोयी-सुविधा याबाबतीत आपण या बड्या परदेशी कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाही हे जेआरडींनी पक्के ओळखले होते म्हणूनच त्यांनी आपला भर कायम गुणवत्तेवर ठेवला होता. वक्तशीरपणा, सुरक्षित प्रवास, कमालीची स्वच्छता आणि पारदर्शक व्यवहार या गुणांमुळे परदेशी प्रवासीदेखील "एअर इंडिया"चा वापर करीत. आलिशानतेपेक्षाही अगत्यशीलतेला टाटांनी कायम महत्त्व दिले आणि एक उत्तम आणि उत्कृष्ट टीम घडवून दाखवली. हळूहळू टाटा हवाईसेवेची मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक वाढतच होती. एअर इंडिया आता रोज नवी नवी यशोशिखरे पादाक्रांत करत होती. या यशात जेआरडींचा वाटा सिंहाचा होता.
१९६८ साली लंडनच्या "डेली मेल" या वृत्तपत्राने "एअर इंडियाला" सर्वोत्कृष्ट विमानसेवा असा बहुमान जाहीर केला. यात जेआरडी टाटांचे आपल्या या स्वप्नावरील प्रेम आणि त्यांचे प्रयत्न कारणीभूत होते.

एअर इंडियाचे जनक आणि अध्यक्ष : श्री. जेआरडी टाटा
दुसर्‍या महायुद्धात निर्मिती केलेली आणि वापरण्यात आलेली छोटी डाकोटा विमाने अमेरिकेने विक्रीस काढली होती. ती विकत घेऊन नागरी हवाई सेवा चालू करायचे प्रस्ताव अनेकांनी सरकारपुढे मांडले. याबद्दल जेआरडींचे स्पष्ट मत असे होते की देशात फारतर ३ किंवा ४ चांगल्या हवाई कंपन्या असाव्यात. उगीच एक ना धड भाराभार चिंध्या असे होऊ नये अशी जेआरडींची प्रामाणिक इच्छा होती. कारण जर स्पर्धा वाढली तर प्रवासदर कमी केले जातील, ज्याचा परिणाम निकृष्ट सेवा पुरवण्यात होईल याची त्यांना खात्री होती. पण नेहमीप्रमाणे नफेखोरीच्या मागे लागलेल्या सरकारने जेआरडींच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करून एकदम १४ नवीन विमान कंपन्यांना परवानगी दिली. पण अल्पावधीतच त्यातल्या बर्‍याचश्या कल्पना एकतर बंद पडल्या किंवा नुकसानीत गेल्या. शेवटी या सर्व हवाईसेवांचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे असे सुचवण्यात आले. याला मात्र जेआरडींचा विरोध होता. "राष्ट्रीयीकरणामुळे जर लोकांना व्यवस्थित सेवा पुरवता येणार असतील तरच राष्ट्रीयीकरण व्हावे. पण मग जे उद्योग लालफितशाही, गलथान व्यवहार किंवा बेजबाबदार कामगार संघटना यांच्यामुळे धोक्यात येऊ शकतात त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण असता कामा नये. त्यांचे नियंत्रण खाजगीच हवे. हवाई सेवा ही कार्यक्षमतेच्या बळावर चालते तेव्हा तिचे राष्ट्रीयीकरण होता कामा नये." असे जेआरडींचे ठाम मत होते.
शेवटी पहिल्या वर्षात उत्तम कामगिरी करणार्‍या बर्‍याच हवाई कंपन्या दुसर्‍याच वर्षी डब्यात जायची वेळ आली तेव्हा राष्ट्रीयीकरण होणार हे पक्के झाले. दुर्दैवाने इतर घाट्यांत गेलेल्या कंपन्यांबरोबर एअर इंडियाचाही यात नंबर लागला. ही भरपूर नफा मिळवून देणारी कंपनी आपल्या ताब्यात घ्यायला सरकार टपलेलेच होते. तेव्हा जेआरडी टाटांनी आंतरराष्ट्रीय सेवेसाठी एअर इंडिया आणि आंतर्देशीय सेवेसाठी 'इंडियन एअरलाईन्स' असे विभाजन सुचवले. शेवटी बरीच चालढकल होऊन  सरकारने हे विभाजन मान्य केले आणि  नाममात्र मोबदला देऊन सर्व विमान सेवा सरकारी ताब्यात घेतल्या गेल्या. पण पंडित नेहरूंनी या क्षेत्रातला जेआरडींचा अनुभव आणि या क्षेत्रावरचे त्यांचे प्रेम लक्षात घेऊन या दोन्ही कंपन्यांचे अध्यक्षपद जेआरडींनाच देऊ केले.
यावेळी खरेतर हा प्रस्ताव नाकारण्याचा सल्ला जेआरडींच्या बहुतेक हितचिंतकांनी, मित्रांनी त्यांना दिला होता. पण आपण जन्माला घातलेल्या, पोटच्या पोराप्रमाणे वाढवून उर्जितावस्थेत आणलेल्या या व्यवसायाचा, एअर इंडियाचा दर्जा, पत घसरणे जेआरडींना कधीच मान्य झाले नसते. त्यांनी शेवटी नकार द्यायचा बेत रहित करून १९७८ पर्यंत फक्त एअर इंडियाचे अध्यक्षपद भूषवले. तोपर्यंत एअर इंडियाने आपला नावलौकिक आणि दर्जा सांभाळून ठेवला होता, अजून वाढवला होता. पण दरम्यानच्या काळात त्यांच्यात आणि मोरारजी देसाई यांच्यात काही तणाव निर्माण झाले होते आणि आणीबाणीनंतर सत्ता मिळताच मोरारजीनी पहिले काम केले ते म्हणजे अत्यंत अपमानास्पद रितीने एअर इंडियाच्या अध्यक्षपदावरून जेआरडींना हटवले. त्यानंतर काही काळातच परत सत्ता हातात येताच कै. इंदिराजींनी त्यांची संचालकपदी नेमणूक केली. यानंतरही एअर इंडियाच्या यशाचे आलेख चढतेच राहिले.
सद्ध्या परिस्थिती उलटलीय. घसरण सुरू झालीय. ती एक वेगळी कथा आहे. त्यावर एक वेगळा लेख होऊ शकेल. पुढे कधीतरी लिहीनही कदाचित. सद्ध्यातरी इथेच थांबतो.
पण एअर इंडियाच्या या यशाचे जनक आणि हक्कदार मात्र निर्विवादपणे जेआरडी टाटाच होते, आहेत आणि राहतील.

लेखक: विशाल कुलकर्णी , पुणे.
भ्रमणध्वनी : ०९९६७६६४९१९


लेखनासाठीचे संदर्भ :

१. सौ. माधुरी शानभाग यांच्या जेआरडी या पुस्तकातील 'आकाशाचा महाराजा" हा लेख
२. छायाचित्रे : आंतरजालावरून साभार
३. बरीचशी माहिती विकिपीडियावरूनही घेतली आहे.




११ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

विशालभाऊ, एकदम जबरदस्त माहिती दिलीस... आकाशाचा महाराजा मिळवायला हवं आता. धन्स रे !!

:) :)

पाषाणभेद म्हणाले...

फारच रोचक इतिहास उलगडून सांगितला आपण.

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

सुहास, पुस्तकाचे नाव "जेआरडी" आहे. लेखिका आहेत सौ. माधुरी शानबाग. त्यातील एक लेख आहे आकाशाचा महाराजा !
रच्याक मंडळी, मन:पूर्वक आभार !!

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ म्हणाले...

विशालजी,
आपल्या लेखाने मला पुण्यातील हवाईदलाच्या अनेक बिल्डींग्जची आठवण झाली. मी ज्या ऑफिसात बसत असे ते टाटांच्या विमानसेवेसाठी बनवलेल्या इमारतींपैकी होते. आजही ९ बीआऱडीच्या नगररस्त्यावरील प्रवेशद्वाराला टाटागार्डरुंम म्हटले जाते. एक द्रष्टा उद्योजक आणि स्वाभिमानी भारतीय असा त्याचे लौकिक खरोखरच गौरवास्पद होता.

अनामित म्हणाले...

great great & greatest

fully inspirational

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

छान. लेख आवडला. ‘मर्मबंधातली ठेव’ असे आपण म्हटले आहे ते अगदी समर्पक आहे.

सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.

जेआरडी वरच्या दुसर्‍या एका पुस्तकात, बहुधा ‘टाटा’चे अर्थसल्लागार पेंडसे यांच्या पुस्तकात एअर इंडिया हातून गेल्याचे त्यांच्या मनाला इतके लागून राहिले होते याचे विस्तृत वर्णन आहे. त्याची आठवण झाली.

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

धन्यवाद सगळ्यांचे !
सुधीरजी , त्या पुस्तकाचे नाव कळेल का? मला तो पुर्ण इतिहास हवा आहे. आईकडून लेकरु हिसकावून घ्यावं तसं केलं होतं आपल्या नतद्रष्ट सरकारने :(

सुधीर कांदळकर म्हणाले...

बहुधा
जेआरडी
लेखक द. रा. पेंडसे

Alvika म्हणाले...

chhan mahitipurn lekh. itihas mast ulagadun dakhavalay.

क्रांति म्हणाले...

चांगलाच लिहिलास लेख विशाल. खूप उत्तम माहिती मिळाली.