आठवणीतले क्षण !

रेऽ मधुऽऽ, उऽठ. ८ वाजलेत. आजपासून ऑफिस आहे नाऽऽ?"
 
"काय हे ! लग्नाच्या ८ व्या दिवशी सक्काळ सकाळी ८ वाजता कोणी उठतं का? ते ही ऑफिसला जाण्यासाठी ?" इति अस्मादिक.
 
"ए कोट्या काय करतोयस? आ‌ई येतील इतक्यात ओरडत. उऽऽठ ना रे. बघ, नाश्ता सुद्धा तयार आहे आणि आजपासून तुझा डब्बा मी करणारे..."
 
"ओऽह शिट्ट !"
 
"ओऽऽ.... ठीक आहे मग. उद्यापासून तुझ्या आ‌ईच्याच हातचा डबा घेऊन जा. मी नाही बनवणार.." असं फणकारून ती रागाने पाय आपटत वळून बाहेर जाणार इतक्यात मी तिचा हात धरून मागे ओढले.
 
"एऽ लाडाबा‌ई, रागावलीस..?"
 
"नाही. आधीच सांगायचं नाही का तुला माझ्या हातचा डब्बा नकोय म्हणून. उगाच पहाटे उठून आटापिटा केला नसता."
 
"गंमत केली मी. ते ’ओह शिट्टआ‌ई ये‌ईल म्हणालीस ना त्यासाठी होतं !".
 
हुऽश्श! हे ऐकून ती ही गालातल्या गालात हसली. जाता जाता परत ८ वाजल्याची आठवण तेवढी करून दिली.
 
मग ना‌ईलाजास्तव उठून मी ही आवरायला लागलो.
 
"श्वेतुऽऽ, गाडीची चावी सापडत नाहीय. तू पाहिलीस काऽ?"
 
"काऽय रेऽ, श्वेतू श्वेतू लावलंयस? आ‌ईला विसरलास? बायको आली की लगेच...." आ‌ईने मागून आवाज दिला.
 
आ‌ई तू पण ना… मला उशीर झालाय नी तुला चेष्टा सुचतेय.”
 
तेवढ्यात आ‌ईने चावी आणून दिली आणि ती “थांब इथेच” म्हणत हसत आत गेली तशी श्वेता बाहेर आली. तिला नजरेनंच मी निघतोय ते सांगितलं. तिनं हातानेच थांब म्हणून सांगितले. जवळ येऊन उगाच शर्टाची बटणं ठीक करत म्हणाली “संध्याकाळी लवकर ये, लग्नात आलेली सगळी गिफ्ट्स उघडून पाहायची आहेत.”
 
“तू पण ना, कुठे तरी बाहेर जाऊ म्हणशील असं वाटलं होतं.” माझा अपेक्षाभंग झाला होता.
 
“गंमत केली मी” म्हणत तिने मला दरवाज्या बाहेर ढकललं सुद्धा. “ए अजून एक...”
मी पुन्हा अपेक्षेने मागे वळलो. “आ‌ईने सांगितलंय की येताना ’मूव्ह’ घेऊन ये. गेले दोन दिवस झाले बाबांचा गुडघा दुखतोय.” पुन्हा अपेक्षा भंग! तसा रागानेच ऑफिसला वळलो. वळताना “सब्र का फल..” वगैरे काही तरी ऐकू आलं.
 
 
संध्याकाळी घरी आलो तेव्हा पाहिलं तर या सासू-सुना कसला तरी पसारा काढून बसलेल्या. चौकशी केली तेव्हा कळलं की लग्नात आलेल्या आहेर, भेट वस्तूंची उजळणी चालू होती. मी चेंज करण्यासाठी बेडरूमकडे वळलो. मागून श्वेता ये‌ईलच असं वाटलं होतं, पण बेडरूम मध्ये पोचलो तरी ती तिथेच ! या बायकांचं ना.. कै कळतच नै. मी आपला फ्रेश होऊन बाहेर आलो आणि हॉलकडे जाणार इतक्यात मस्त कॉफीचा वास आला. स्टडी टेबलावर कॉफी कप होता, शेजारीच एक नोट चिकटवलेली होती. “पसारा आवरला की खाली बागेत जाऊ. सकाळीच ठरवलं होतं, म्हटलं थोडा दम निघतो का पाहावं." -श्वेतू
 
कॉफीचा आस्वाद घेत अस्मादिक हॉलमध्ये अवतरले तसे सासू-सुना आणखीनच जोरात हसल्या. मी इकडे तिकडे पसरलेल्या वस्तूंवर नजर फिरवत सोफ्याच्या दिशेने वाट काढली. सगळीकडे नुसते पॅकिंग पेपर्स, गिफ्ट रॅपर्स दिसत होते. आलेल्या सगळ्या भेटवस्तू डायनिंग टेबलावर ठेवल्या होत्या.
 
“मधू, यातलं काय काय आवडलं, काय काय वापरायला काढायचं ते बघ एकदा.” … आ‌ई म्हणाली.
 
ते तुमचं तुम्ही बघा, म्हणत मी पुन्हा बेडरूम कडे वळलो. १५ मिनिटात श्वेता आत आली. म्हटलं चला खाली जायला मोकळे म्हणून मी खाली जाण्यासाठी आवरायला लागलो. श्वेता कसलं तरी पॅकिंग काढत होती.
 
“हे आ‌ई-बाबांनी दिलेलं, आपलं लग्नाचं गिफ्ट आहे, म्हटलं तुझ्या सोबतच ओपन करावं.”
 
“अरे हो, ते मी विसरलोच होतो. काय आहे त्यात? फोटो फ्रेम सारखं वाटलं मला. माझाच लहानपणीचा फोटो असेल एखादा. ब्लॅक अ‍ॅंड व्हा‌ईट! बाबांच्या गिफ्टबाबत आयडियाज खूप वेगळ्या आहेत.”
 
“अरेऽ, डायरी आहे वाटतं यात. आणि तीही लिहिलेली. कदाचित दैनंदिनी!” ती पॅकिंग काढत म्हणाली.
 
“दैनंदिनी ? ए नीट बघ. त्यांची दैनंदिनी ते मला का देतील?” मी आवरा आवर करतच तिला नीट बघायला सांगितलं. बाबांचं ना काही सांगता येत नाही. त्यांचं नेहमी असंच असतं, ’काहीतरी वेगळं’!
 
“तारीख १५ ऑगस्ट १९९३..., आज मधूने त्याच्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस मिळवलं. त्याच्या शाळेत झालेल्या ५वी ते १०वी वर्गातल्या चित्रकलेच्या स्पर्धेत त्याला दुसरं बक्षीस मिळालंय. बक्षीस त्याला मिळालंय, पण माझा आनंद गगनात मावत नव्हता. त्या आनंदासोबत एक दु:खही होतं की मला त्याच्या कार्यक्रमाला जाता आलं नाही. बक्षिसाबद्दल मिनुने फोन करून सांगितल्यावर घरी येतानाच त्याच्यासाठी म्हणून कलर बॉक्स आणला.” श्वेता वाचत होती. कानावर शब्द पडत होते खरे, पण मी भूतकाळात गेलेलो. तो स्टेज, ते बक्षीस आणि तो मित्रांचा माझ्याभोवती पडलेला घोळका. तो दिवस आजही मला आठवतो. त्या दिवशी चित्रकलेत मला दुसर्‍या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं खरं, पण ते बक्षीस माझ्या आयुष्यातलं माझं पहिलं बक्षीस होतं ते मला आज कळलं होतं. त्या दिवशी बाबा कार्यक्रमाला आले नव्हते हे तेव्हा माझ्या लक्षातही आलेलं नव्हतं, कदाचित बक्षिसाच्या नादातच होतो वाटतं. मी नकळतच स्तब्ध झालो. हातातलं सगळं सोडून श्वेताजवळ येऊन बसलो. ती वाचतच होती. मध्येच थांबून तिने काही पाने मागे पालटली.
 
“तारीख १३ जून १९८६..., आज मधूचा शाळेतला पहिला दिवस होता. त्याच्या पेक्षा जास्त हुरहुर मला लागली होती आणि तेवढाच आनंदही झालेला. हा रडून गोंधळ वगैरे घालेल म्हणून मिनुच्या ऐवजी मीच शाळेला सोडायला गेलेलो. खरंतर तो रडला असता तर माझीही तिच अवस्था झाली असती जी मिनुची झाली असती. आश्चर्य म्हणजे मधू रडला नाही. पण आजूबाजूची रडणारी मुलं पाहून थोडा घाबरलेला होता.”
हळूच मी श्वेताचा हात धरून तिला पुढं वाचण्यापासून थांबवलं.
 
“काय झालं रे ? असा का शांत झालास?”
 
श्वेतू, पहिल्या पानापासून वाच. ही बाबांची दैनंदिनी नाहीय. हे सारं माझ्याबद्दल आहे.” असं म्हणतच मी ती डायरी हातात घेतली.
 
त्याचं पहिलं पान उघडलं. ’आठवणींतले क्षण !’ - डायरीच्या थोड्या पिवळसर झालेल्या त्या पानावर वरच्या कोपर्‍यात लिहिलं होतं.
 
हो, पान जरा पिवळसर झालंय, अगदी बाबांसारखं. जे कधीकाळी एकदम पांढरं शुभ्र होतं. त्यांच्या मनाच्या कोपर्‍यातही असेच काही आठवणींतले क्षण असतील जशी या पानाच्या कोपर्‍यात ही अक्षरे. बाबांचं अक्षर असं खूप सुंदरही नाहीय पण तसं वाईटही नाहीय. जणू त्यांचं व्यक्तिमत्त्वच, चार चौघांसारखं... लक्ष वेधून घेण्यासारखं नाहीय, पण कोणी दुर्लक्ष करण्यासारखंही नाहीय. दोन्ही अगदी सामान्य. पिवळ्या पानावरची ही अक्षरे एका कोपर्‍या असली तरी त्यांचा ठसा पानांच्या मागील बाजूस अजूनही ठळकपणे जाणवत होता. बाबांच्या मनाच्या दुसर्‍या बाजूस असे ठळक ठसे अजूनही असतील का……..?  कधी असे वाटले नाही. वाटले नाही, की जाणवले नाही….?  जाणवले नाही की आपण लक्ष दिले नाही ?
 
“अरे पालट ना पान. किती वेळ झाला ते दोनच शब्द वाचतोयस!” हातावर फटका मारत श्वेता ओरडली.
मी पहिलं पान पालटलं तसं तिनं वाचायला सुरवात केली देखील.
 
“तारीख २८ ऑगस्ट १९८३, आज आम्हाला मुलगा झाला. असे वाटत होते की मिनु आणि मीच या जगातले सर्वात सुखी जोडपे आहोत. आमचा आनंद शब्दात नाही मांडू शकत. पण आमच्या मुलाची प्रत्येक पहिली गोष्ट आम्ही शब्दात मांडून ठेवणार आहोत. खरं तर ही मिनुची कल्पना. पण ती म्हणते तिला भावना शब्दात मांडायला जमत नाहीत, म्हणून ते मांडायचे काम माझ्याकडे. तसं मला भावना बोलून नाही दाखवता येत, म्हणून लिहून ठेवत असतो. हे दुसरे कारण ज्यामुळे हे लिहायचे काम माझ्याकडे आहे. पाहू, संकल्प तर केलाय.. कुठवर पूर्णं करू शकतो ते. नाहीतरी मिनु आहेच सोबत.”
 
“वॉऽव! मधू, म्हणजे हे सगळं तुझ्याबद्दल आहे. म्हणजे तुझे लहानपणीचे उद्योग. आय ऍम सो एक्सा‌ईटेड टू रिड धिस! ए, २८ ऑगस्ट तुझी जन्म तारीख ना?” श्वेता स्वत: बडबडली आणि पुढचं पान पालटून वाचायला सुद्धा लागली.
 
“तारीख २ सप्टेंबर १९८३, आज मी पहिल्यांदा बाळाला घेतलं. केवढा लहान आहे तो. त्याने जर माझं बोट पकडलं तर त्याची अख्खी मूठ माझ्या बोटाच्या तीन भागा पैकी पहिल्या भागातच मावेल. इवले इवलेसे हात, इवले इवलेसे पाय. घेतल्या क्षणी मला असं वाटलं की याने उठावं आणि बाबा म्हणून मला गच्च मिठी मारावी. मी तसं मिनु ला सांगितलं तर, कित्ती ती घा‌ई म्हणून तिने मलाच फटकारलं”.
 
मला आठवतही नव्हतं, बाबांना मी शेवटची मिठी कधी मारलेली. त्या दिवशीच्या चित्रकलेच्या बक्षीस समारंभापासून ते आज प्रोजेक्टचा सीनिअर ग्राफिक्स डिजा‌ईनरचा प्रवास देखील मला कुठे नीटसा आठवतोय? बाबांची ही दुसरी बाजू कधी दिसलीच नाही मला. नेहमी शिस्त आणि कडक वाटणारे बाबा एवढे हळवे असू शकतील असं वाटलं ही नव्हतं. श्वेताच्या पान पालटण्याच्या आवाजाने माझी विचारांची साखळी तुटली.
 
“तारीख १८ फेब्रुवारी १९८४, आज मधू रांगायला लागला. तसं म्हणजे पूर्णं रांगत नाही, पण त्याने आज पहिल्यांदा रांगायचा सफल प्रयत्न केला. दोन दिवस झाले, तसा तो त्याच्या दोन नाजुकश्या हातांवर आणि गुडघ्यावर स्वत:चा भार उचलून धरत होता.”
 
“सोऽऽ क्युट ना मधू. अरे म्हणजे लग्नानंतर चार दिवसांनी तुझ्या रांगण्याला २८ वर्षे पूर्णं झाली.”
असं म्हणत ती हसायला लागली. मला लिंक न लागल्याने प्रश्नार्थक चेहर्‍याने तिच्याकडे पाहिले.
 
“अरे बुद्दू, १४ फेब्रुवारीला आपण लग्नाळलो. आणि १८ ला तू पहिल्यांदा रांगलेलास, म्हणून म्हटलं की लग्ना नंतर ४च दिवसात तुझी रांगायला लागल्याची २८ वर्षे पूर्णं झाली.” मी फक्त स्मित हास्य केले.
 
ती पुढे वाचत होती, असे वाटत होते की एक एक किस्से डोळ्यासमोर उभे आहेत. बाबांनी माझी प्रत्येक पहिली गोष्ट त्यांच्या आणि आ‌ईच्या नजरेतून लिहून ठेवली होती. काही ठिकाणी शेवटी ’इति मिनु.’ असे होते. कदाचित ते आ‌ईने अनुभवलेले, पाहिलेलेही त्यांनी तिच्याकडून ऐकून लिहिलेले असावे.
 
“तारीख ७ एप्रिल १९८४, पहिल्यांदाच मधूला काल रात्री १०१ एवढा ताप आलेला. बिचारा, काल रात्रभर झोपला नाही. मिनु तर त्याला मांडीवरच घेऊन बसून होती. थोड्या थोड्या वेळाने, पट्ट्या बदलणे, थंड पाण्याने अंग पुसणे चालू होते. आज सकाळी उठल्या उठल्या मी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. त्यांनी रक्त तपासणी करून घेतली. एवढ्या बाळाला त्या नर्सने ४ वेळा सु‌ई टोचली. पहिल्यांदा बोटातून रक्त काढले, हा खूप रडायला लागला तसं रक्त घेणं त्या नर्सला जमतच नव्हते. तपासणीला पुरेसे रक्त मिळत नाहीय म्हणून हाताच्या नसेमधून रक्त घ्यायचे ठरवले. पहिल्यांदा डाव्या हाताला सु‌ई लावली. दोन वेळा टोचूनही नस सापडेना म्हणून तिने डॉक्टरला बोलवले. त्याने उजव्या हाताला टोचून रक्त घेतले. असल्या शिकाऊ नर्स का ठेवतात कोण जाणे. एवढासा तो जीव, कित्ती आकांताने रडत होता. शेवटी शेवटी मला पाहवतही नव्हते. माझा चेहरा पाहून डॉक्टर म्हणाले ’तुम्ही बाहेर उभे राहा, काही काळजी करू नका आम्ही आहोत.’ आणि इच्छा नसूनही मला बाहेर उभे राहावे लागले. बरं झालं मिनुला नेले नव्हते, नाही तर त्याचे रक्ताने माखलेले हात पाहून ती चक्कर येऊन पडली असती. एवढ्याश्या जिवाचे आज खूप हाल झाले. उद्या रिपोर्ट मिळेपर्यंत समाधान नाही.”
 
खरंच, हे माझे कडक, शिस्तप्रिय बाबा आहेत का? खरंच, हा माणूस इतका हळवा आहे? की मला माझे बाबा कधीच कळले नाहीत? मला झालेला त्रास पाहून, मला रडताना पाहून डोळ्यांत पाणी आणणारे माझ्या आ‌ई बाबांचं हे रूप मी कधीच पाहिलं नाही आजवर. प्रत्येक क्षणाला, श्वासासकट अनुभवणारं हे जोडपं, नेहमी हसताना खेळताना पाहिलंय मी. प्रत्येक चुकीला शिक्षा देताना पाहिलंय, प्रत्येक चांगल्या कामाला शाबासकी देताना पाहिलंय, पण एवढे हळवे असतील असं कधीच नाही वाटलं.
 
क्षणभर मला सकाळची गोष्ट आठवली. आ‌ईने बाबांसाठी मूव्ह आणायला सांगितलेले. दोन-तीन दिवस झाले घरीच होतो तरी आणणे झाले नाही. आज ऑफिसवरून येतानाही मी आणू शकलो असतो, तेव्हाही विसरलो. साधी सरळ गोष्ट आहे, जर मी आजारी असतो तर ते असे वागले असते का?
 
नंतर किती तरी वेळ श्वेता वाचत होती. जणू माझ्या डोळ्यांसमोरून चित्रं सरकत होती. माझं पहिल्यांदा उठून बसणं, पहिलं पा‌ऊल, पहिलं धडपडणं, आ‌ईचा खाल्लेला पहिला मार, बाबांनी दिलेला पहिला फटका, पहिली पाटी, पहिलं दफ्तर, पहिली शाळा, पहिली दसरा-दिवाळी काय नव्हतं त्या डायरीत. मी, माझं बालपण, माझं तारुण्य. पूर्णं डायरीभर मीच भरून उरलो होतो. आ‌ई बाबांनी जणू मला माझं बालपण परत दिलं या डायरीतून. मन कसं भरून आलेलं. तडक उठलो अन हॉल मध्ये आलो. तिथे आ‌ई बाबांच्या गप्पा चाललेल्या, मी असं पाणावलेल्या डोळ्यांनी अचानक पुढ्यात येऊन उभा राहिल्याने त्यांना काही कळेचना. बाबांचे “अरे बेटा ,काय झाले?” वाक्य पूर्णं व्हायच्या आतच मी त्यांना एक गच्च मिठी मारली. बाबा पुरते गोंधळलेच अशाने.
 
“धन्यवाद बाबा! तुम्ही दिलेल्या ’आठवणींतल्या क्षणां’बद्दल. माझं बालपण मला दिल्याबद्दल.”
 
आ‌ईला मग कुठे खुलासा झाला की मी का इतका भावुक झालोय. बाबांनीही मग मला कडकडून मिठी मारली. त्या स्पर्शातून खूप काही बोललो आम्ही, एकमेकांशी. वेडाच आहेस म्हणत, आ‌ईने हलकेच पाठीवर धपाटा मारला. बाबांनी लगेच कमेंट पास केली, खाल्लास लग्नानंतरचा पहिला धपाटा! श्वेत्या लिहून ठेव हं. आणि तिकडे श्वेता आमचा फॅमिली ड्रामा पाहून काय करावं सुचेनासे झाल्याने भारावून नुसती पाहतच उभी राहिलेली.


लेखक: मल्लीनाथ करकंटी
 
 
 
 

१५ टिप्पण्या:

Sahaj suchala mhanun म्हणाले...

mast lihilayas mallinath :)

अनामित म्हणाले...

mallinaath, khup sundar lihiliyes.

Suman म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Suman म्हणाले...

Khup Chan :)

Suhas Diwakar Zele म्हणाले...

सुंदर.. एकदम भावस्पर्शी झालाय लेख...

खरोखरच लाख मोलाचे क्षण आमच्यासमोर उभे केलेस... :) :)

piapeti म्हणाले...

छान !!!!

TheCyclone म्हणाले...

मस्त मस्त मस्त!!! :-)

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

जियो मल्लिनाथा, जिवंत उभे केलेस रे सगळे क्षण!

सुधीर कांदळकर म्हणाले...

छान.

Shreya's Shop म्हणाले...

आयडियाची कल्पना छान आहे ही क्षण जपण्याची.

Parija... म्हणाले...

वाचता-वाचता डोळ्यात कधी पाणी उभं राहीलं हे समजलं देखिल नाही. एकदम भावस्पर्शी लिहिलयत. मनापासून आवडलं.

ashwini म्हणाले...

chhaan....

sumedha म्हणाले...

मस्तच लिहीलंय्स रे मल्ल्या...खुप गोड :)

Prajakta Tharthare(Parijatak) म्हणाले...

मल्ली, खूपच सुंदर लिहिले आहेस. क्षणभर डोळे पाणावले वाचून... :) प्रत्येक प्रसंग जिवंत उभा केल्याबद्दल 'Hats off to you' !!

अनामित म्हणाले...

Kharch malli mast lihiles!!! khup goshtina ujala devun jate he..