सर जगदीशचंद्र बसू

र जगदीशचंद्र बसू. त्यांच्या मातृभाषेंतील म्हणजे बंगाली उच्चार सर जॉगदीशचॉंद्र बॉशू. जन्म ३० नोव्हेंबर १८५८. एक चतुरस्त्र वैज्ञानिक. भौतिकशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ आणि पुरातत्वज्ञ. सुरुवातीच्या थोडक्या विज्ञानसाहित्यिकांपैकी एक. रेडिओ आणि सूक्ष्मलहरी प्रकाशविज्ञान (मायक्रोवेव ऑप्टिक्स) यांतील संशोधनाचा वस्तुपाठ त्यांनी घातला. वनस्पतिशास्त्रात त्यांनी मोलाची भर घातली. भारतीय उपखंडांत प्रायोगिक विज्ञानाचा पायाच त्यांनी घातला. रेडिओ विज्ञानाचे जनकत्त्व ज्या कांही मोजक्या शास्त्रज्ञांकडे जाते, त्यांपैकी एक. बंगाली विज्ञानसाहित्याचे जनक आणि अमेरिकन हक्क - पेटंट मिळवणारी भारतीय उपखंडातील पहिली व्यक्ती अशी त्यांची थोडक्यात ओळख करून देता येईल.

भारतावर ब्रिटिशांचे राज्य असतांना बंगालमधील मुन्शीगंज जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. मुन्शीगंज जिल्ह्यातील रारीखाल, बिक्रमपूर हे त्यांचे मूळ गांव. सध्या हा मुन्शीगंज जिल्हा बांगला देशात आहे. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू यांनी ब्राम्हो समाजाचा स्वीकार केला होता आणि ते फरीदपूर येथे उपदंडाधिकारी (डेप्युटी मॅजिस्ट्रेट) तसेच सहायक आयुक्त (असिस्टंट कमिशनर) म्हणून कार्यरत होते. इंग्रजी शिक्षण घेण्याअगोदर आपल्याला आपल्या मातृभाषेची तसेच स्वकीयांची नीट ओळख असावी असें भगवानचंद्रांचे मत होते त्यामुळे त्यांनी छोट्या जगदीशचंद्रला प्रथम बंगाली माध्यमाच्या शाळेत घातले. १९१५ साली बिक्रमपूर येथील एका परिषदेत जगदीशचंद्र म्हणाले होते, "त्या काळीं मुलांना इंग्रजी शाळेत पाठवणे हे उच्चभ्रू लोकांत एक प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाई. मी जात असलेल्या देशी शाळेत माझ्या उजव्या बाजूला माझ्या वडिलांच्या मुस्लिम चपराशाचा मुलगा बसत असे तर डाव्या बाजूला एका कोळ्याचा मुलगा. हे दोघे माझे खेळगडी होते. त्यांच्या तोंडून पशुपक्ष्यांच्या आणि जलचरांच्या गोष्टी ऐकतांना मी मंत्रमुग्ध होऊन जात असे. कदाचित त्या गोष्टींमुळेच माझ्या मनात निसर्गाच्या किमयेबद्दल तीव्र जिज्ञासा निर्माण झाली असावी. माझ्या या सवंगड्यांसमवेत घरी आल्यावर माझी आई आम्हाला कोणताहि पंक्तिप्रपंच न करता खाऊ घालत असे. जरी ती एक सनातनी कर्मठ स्त्री असली तरी या अस्पृश्यांना आपल्या मुलासारखीच वागणूक देतांना तिच्या मनात कधीच अपराधी भावना दाटली नाही. त्यांच्याशी असलेल्या माझ्या मित्रत्त्वाच्या नात्यामुळेच मला ‘खालच्या जातीतले’ म्हणता येतील असे प्राणी कुठे असू शकतील असे कधीहि वाटले नाही. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांना अशी एकच ‘समस्या’ भेडसावू शकेल हे मला कधी समजलेच नाही."

१८६९ सालीं ते हेअर शाळेत गेले आणि १८७५ कलकत्ता विद्यापीठाची पदवीच्या दर्जाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन सेंट झेवियर महाविद्यालयांत प्रवेश घेतला. इथे त्यांची फादर युजीन लफॉं यांच्याशी ओळख झाली. त्यांच्यामुळेच त्यांना निसर्गविज्ञानाची गोडी लागली. १८७९ मध्यें त्यांनी पदवी मिळवली. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्यांनीं लंडन विद्यापीठात प्रवेश घेतला खरा पण प्रकृती बिघडल्यामुळे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. मग ते भारतात परत आले आणि कलकत्ता विद्यापीठातील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकविज्ञानाचे (फिजिक्सचे) अधिव्याख्याते म्हणून रुजू झाले. इथे गोर्‍यांचा वंशभेद आणि तुटपुंजा निधी आणि अपुरी साधनसामग्री याचा सामना करीतच आपले संशोधन त्यांनी चालू ठेवले. दूरवर बिनतारी संदेश (वायरलेस सिग्नल) पाठविण्यात त्यांनी भरघोस प्रगती केली आणि संदेशग्रहणासाठीं सर्वप्रथम उभयवाहकाचा (सेमीकंडक्टरचा) उपयोग केला. पण केवळ आपल्या या संशोधनाचा इतरांना विकास करता यावा म्हणून त्यांनीं या संशोधनाचे हक्क (पेटंट) न घेता ते प्रसिद्ध केले.

जगदीशचंद्रांना खरे तर इंग्लंडला जायचे होते ते आय सी एस होण्यासाठी. परंतु सरकारी अधिकारी असलेल्या त्यांच्या वडिलांनी त्यांचा हा बेत रद्द केला. आपला मुलगा विद्वान व्हावा आणि परक्या ब्रिटिशांची चाकरी न करता स्वतःच स्वतःचा स्वामी व्हावा अशी त्यांची इच्छा होती. मग जगदीशचंद्र वैद्यकीय शिक्षणासाठीं  इंग्लंडला रवाना झाले. पण तिथे ते आजारी पडले. तिथे शवविच्छेदनादरम्यान येणार्‍या तीव्र दर्पाने त्यांचा आजार बळावला असे म्हटले जाते.

त्यांच्या बहिणीचे यजमान आनंद मोहन हे पहिले भारतीय रॅंग्लर होते. जगदीशचंद्रांना केंब्रिजच्या ख्रिस कॉलेजमध्ये निसर्गविज्ञान शिकायला प्रवेश मिळाला तो त्यांच्याच शिफारसीमुळे हे जरी खरे असलें तरी त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून ब्रिटनमध्ये ट्रायपॉस या नांवानें ओळखली जाणारी पदवी मिळवली आणि १८८४ सालीं लंडन विद्यापीठातून बीएससी ची पदवी मिळवली. केंब्रिजला त्यांना लॉर्ड रेले, मायकल फॉस्टर, जेम्स डेवर, फ्रॅन्सिस डार्विन (विख्यात निसर्गशास्त्रज्ञ सर चार्ल्स डार्विन यांचे सुपुत्र), फ्रान्सिस बाल्फोर आणि सिडनी व्हाईन्स यांसारखे दिग्गज गुरू लाभले.

कलकत्त्यातील एशियाटिक सोसायटीत सर जगदीशचंद्रांच्या १५०व्या जयंतीनिमित्त भरलेल्या परिषदेंत २८ जुलै रोजी केलेल्या भाषणात कलकत्त्याच्या बोस इन्स्टीट्यूटचे संचालक प्रा. शिबाजी राहा म्हणाले की त्यांनीं स्वतः केंब्रिज विद्यापीठाच्या दस्तऐवजातील नोंद तपासून पाहिली आणि त्यांना आढळले कीं केंब्रिजमधून त्यांना ट्रायपॉसव्यतिरिक्त एम ए ही पदवी देखील १८८४ मध्यें देण्यात आली होती.

१८८५ मध्ये जगदीशचंद्र भारतात परत आले. लॉर्ड रिपन तेव्हां व्हाईसरॉय होता. तेव्हां रिपनचा फॉसेट नावाचा आर्थिक सल्लागार होता. या फॉसेटचें रिपनला लिहिलेलें (शिफारस)पत्र तेव्हां जगदीशचंदांनीं सोबत आणले होते. सर आल्फ्रेड क्रॉफ्ट तेव्हां ‘लोकसूचना संचालक’ (डायरेक्टर ऑफ पब्लीक इन्स्ट्रक्शन) या पदावर होते. रिपनच्या विनंतीवरून त्यांनीं जगदीशचंद्रांची प्रेसिडेन्सी कॉलेजमध्यें भौतीकशास्त्राचे कार्यकारी प्राध्यापक - ऑफिशिएटिंग प्रोफेसर ऑफ फिझिक्स - या पदावर नियुक्ती केली. या नेमणुकीविरुद्ध कॉलेजचे प्राचार्य सी एच टॉने (C. H. Tawney) यांनीं निषेध नोंदवला खरा पण त्यांना ती नेमणूक स्वीकारावीच लागली.

या टॉनेच्या आकसामुळे त्यांना संशोधनाच्या सुविधा तर मिळाल्या नाहींतच, वर वेतन ठरवतांना ते वर्णद्वेषाचे बळी ठरले. त्या काळी गोर्‍या प्राध्यापकांना ३०० रुपये वेतन मिळे पण हिंदुस्थानी प्राध्यापकांना केवळ २०० रुपयेच मिळत. जगदीशचंद्र बोस यांची नेमणूक ही कार्यकारी (ऑफिशियेटिंग) अर्थात हंगामी वा तात्पुरती म्हणतां येईल अशीच असल्यामुळें त्यांना केवळ १०० रुपये देऊं केले. स्वाभिमानाचा आणि देशप्रेमाचा एक आगळाच पैलू दाखवितांना त्यांनीं निषेधाचा नवीनच मार्ग पत्करला. त्यांनीं वेतनाचा धनादेश स्वीकारायलाच नकार दिला. तब्बल तीन वर्षे त्यांनीं अध्यापनाचें कार्य विनावेतन केले. शेवटी लोकसूचना संचालक आणि प्राचार्य, दोघांनाहि त्यांच्या अध्यापनाच्या कौशल्याचें आणि त्यांच्या उच्च नीतीमत्तेचें महत्त्व कळून चुकले. त्यांची नेमणूक नोकरीच्या पहिल्या दिवसापासून कायम करण्यांत आली. त्यांना तीन वर्षांचे पूर्ण वेतन एकरकमी देण्यात आले. ते रु. ३०० की २०० याचा उल्लेख मात्र मला चटकन सापडला नाही. कदाचित त्यासाठी कलकत्त्यातच जावे लागेल किंवा इंग्लंडमधील भारतीय अभिलेखात तो तपशील असावा. असो.

प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये धड प्रयोगशाळाहि नव्हती. २४ चौरस फुटांच्या अडगळीच्या जागेत जगदीशचंद्रांना संशोधन करावे लागले. एका अकुशल लोहाराकडून त्यांनीं एक उपकरण घडवून घेतलें. भगिनी निवेदिता लिहितात ‘एका थोर शास्त्रज्ञाला अशा तर्‍हेने पदोपदी गैरसोयी आणि सततच्या मनस्तापाला तोंड द्यावे लागते हे समजल्यावर मला फारच मोठा धक्का बसला.  आपल्या संशोधनासाठी वेळच मिळणार नाही अशा तर्‍हेने कॉलेजचें वेळापत्रक त्यांना पूर्णपणे अडचणीचे आणि गैरसोयीचे बनवले होते.’ रोजच्या चरकातून सुटल्यावर कॉलेजातील आपल्या खोलीतल्या तुटपुंज्या जागेत रात्रीं उशीरापर्यंत जागून त्यांनी आपले संशोधन चालू ठेवले.

ब्रिटिश सरकारचे धोरण वसाहतीतील मूलभूत संशोधनाला अनुकूल असे नव्हतेच. कष्टाने मिळविलेला आपला स्वतःचा पैसा जगदीशचंद्र प्रयोगासाठीची उपकरणे बनवण्यासाठीं खर्च करीत. अशा रीतीने संशोधनाबद्दलच्या त्यांच्या दुर्दम्य ओढीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. भारतांत संशोधनासाठी अनुकूल असे वातावरण नाही म्हणून आज बुद्धिजीवी वर्ग विकसित देशांत स्थाईक होत आहे. या वर्गाने जगदीशचंद्रांपासून धडा घेणे जरूरीचे आहे. ध्येयवादाला कोणत्याहि मर्यादा नसतात हेच खरे.

१८८७ मध्यें ब्राम्हो समाजांतील सुप्रसिद्ध समाजसुधारक दुर्गा मोहन दास यांची कन्या अबला हिच्याशी त्यांचा विवाह झाला. १८८२ मध्यें मद्रास इथें वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अबलाला बंगाल सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. परंतु तिला देखील प्रकृती अस्वास्थ्यामुळेच ते वैद्यकीय शिक्षण  नवर्‍याच्या पावलावर पाऊल ठेवून सोडावे लागले. या दांपत्याच्या आयुष्यातील हा एक चमत्कारिक, गमतीदार योगायोग म्हणावा लागेल. लग्नाच्या वेळी जगदीशचंद्र वेतन न घेण्याच्या भूमिकेमुळें तसेच (हयात असलेल्या) वडिलांनी केलेल्या कर्जामुळे आर्थिक संकटात सापडले होते. नवपरिणीत दांपत्याला टंचाई आणि उपासमारीचा सामना करावा लागला. परंतु त्याहि परिस्थितीत त्यांनीं तग धरला आणि वडिलांचें कर्ज फेडले. कर्ज फेडल्यानंतरचीं कांहीं वर्षे त्यांचे आईवडील हयात होते.

जेम्स क्लार्क मॅक्सवेल या ब्रिटिश सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञाने विस्तृत तरंगलांबीच्या विद्युत्चुंबकीय लहरीचे अस्तित्त्व ( existence of electromagnetic waves of diverse wavelengths ) गणिताने सिद्ध केले होते. परंतु त्यानें गणिताने मांडलेली उपपत्ती ( hypothesis) प्रयोगाने सिद्ध व्हायच्या अगोदरच सन १८७९ मध्ये तो मरण पावला. ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ ऑलिव्हर लॉज याने मॅक्सवेलने वर्तवलेल्या लहरी १८८७-८८ सालीं तारेतून दुसर्‍या ठिकाणीं पाठवल्या. १८८८ साली जर्मन वैज्ञानिक हेन्रिक हर्टझ्‌ यानें अवकाशातील (space) विद्युत्चुंबकीय लहरींचे (electromagnetic waves) अस्तित्त्व प्रयोगाने दाखवले. त्यानंतर हर्टझ्‌चे संशोधन पाहून हर्टझ्‌च्या मृत्यूनंतर जून १८९४ मध्ये ऑलिव्हर लॉजने त्याच्या स्मरणार्थ एक भाषण दिले आणि ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. लॉजच्या संशोधनाने देशोदेशींचे अनेक शास्त्रज्ञ प्रभावित झाले होते. त्यांत जगदीशचंद्रांचाहि समावेश होता.

जगदीशचंद्रांनी केलेल्या सूक्ष्मलहरींच्या संशोधनातील एक महत्त्वाचा भाग असा कीं त्यांनी काही मिलीमीटरमध्ये मोजण्याइतपत, सुमारें ५ मिमी पर्यंत कमी तरंगलांबीच्या(wavelength) सूक्ष्मलहरी प्रयोगासाठी वापरल्या. सूक्ष्मलहरींच्या प्रकाशसदृश गुणधर्माचा (optical properties of microwaves) अभ्यास करतांना जास्त तरंगलांबीमुळे (higher wavelength) होणार्‍या गैरसोयी त्यांनीं जाणल्या होत्या.

सन १८९३ मध्ये निकोला टेस्ला यांनीं पहिला रेडिओ संपर्क साधून दाखवला. त्यानंतर जवळजवळ वर्षभराने नोव्हेंबर १८९४ वा १८९५ मध्ये (नक्की माहिती उपलब्ध नाहीं) जगदीशचंद्रांनीं कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये केलेल्या जाहीर प्रयोगात काही मिलीमीटर तरंगलांबीच्या विद्युत्चुंबकीय लहरी वापरून दूर अंतरावरील बंदुकीची दारू पेटवली तसेच विजेवर चालणारी घंटाही वाजवून दाखवली. मात्र रिमोट कंट्रोल ही संकल्पना देखील तोपर्यंत कोणी मांडली नसावी. वैज्ञानिक प्रयोगात एवढे नाट्य बहुधा प्रथमच आले असणार. या प्रतिभेने मन थक्क होते. त्यानंतर त्यांनी बंगाली भाषेतून ‘अदृश्य आलोक’ म्हणजे ‘न दिसणारा प्रकाश’ या नावाचा एक निबंध लिहिला. हा अदृश्य प्रकाश विटांच्या भिंतीतून आरपार जाऊ शकत असे. त्यामुळे तारेच्या माध्यमाविना संदेश पाठवणे शक्य होईल असे त्यात प्रतिपादन केले होते. रशियात पापॉव्हनेहि असेच प्रयोग केले. डिसेंबर १८९५ मध्ये पापॉव्हने केलेल्या नोंदीवरून दिसते की रेडिओ लहरी वापरून संदेशवहन करता येईल असे त्याला वाटत होते.

लॉजच्या प्रबंधानंतर वर्षभरातच म्हणजे मे १८९५ मध्ये जगदीशचंद्र बसूंनी ‘ऑन पोलरायझेशन ऑफ इलेक्ट्रिक रेज बाय डबल रीफ्रॅक्टिंग क्रिस्टल्स’ हा आपला पहिलावहिला विज्ञानविषयक प्रबंध बंगालच्या एशियाटिक सोसायटीला पाठवला. ऑक्टोबर १८९५ मध्यें लॉर्ड रेले (Rayleigh) यांनी बसूंचा ‘ऑन अ न्यू इलेक्ट्रो-पोलॅरिस्कोप’ हा दुसरा प्रबंध लंडनच्या रॉयल सोसायटीला पाठवला. डिसेंबर १८९५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लंडनच्या द इलेक्ट्रीशियन (खंड ३६) या जर्नलमध्यें हा प्रबंध प्रसिद्ध झाला. त्या सुमारास हर्टझ्‌नें बनवलेल्या तरंगग्राहकाला वा तरंगसंवेदकाला (radio receiver or radio detector) तमाम इंग्रज भाषिक विश्वात ‘कोहरर’ (coherer) हा लॉजने योजलेला शब्द वापरला जात असे. बसूंच्या ‘कोहरर’वर ‘द इलेक्ट्रीशियन’ने छान टिप्पणी केली. या टिप्पणीचा वृत्तांत देतांना ‘इंग्लिशमन’ने म्हटले आहे

"प्राध्यापक बोस यांना जर कोहरर पूर्णत्वाला नेऊन त्याचे पेटंट घेणे शक्य झाले तर प्रेसिडेन्सी कॉलेजातील प्रयोगशाळेत एकहाती संशोधन करणार्‍या एका बंगाली वैज्ञानिकाच्या हस्ते अखिल नौकानयन जगतातील समुद्रकिनारे उजळून निघतील."

प्रत्यक्षात बसूंनीं कोहरर पूर्णत्वाला नेण्याचा बेत केला होता पण पेटंट घेण्याचें त्यांच्या कल्पनेतही आलेलें नव्हते.

त्यानंतर सुमारे दोन वर्षांनी मे १८९७ मध्ये सॉल्सबरी (Salisbury) मैदानावर मार्कोनीने त्याचा बिनतारी संदेशाचा प्रयोग केला. १८९६ मध्यें बसू लंडनला व्याख्यानाच्या दौर्‍यावर गेले असतांना मार्कोनीला भेटले. तेव्हा मार्कोनी ब्रिटिश टपाल खात्यासाठी बिनतारी संदेशवहनाचे प्रयोग करीत होता. एका मुलाखतींत बसूंनी म्हटले होते कीं व्यापारी तत्त्वावरील बिनतारी संदेशवहनात आपल्याला बिलकुल स्वारस्य नाहीं आणि कोणाला हवे असेल तर माझॆ संशोधन कोणीहि वापरू शकतो. १८९९ मध्ये बसूंनी आपण टेलिफोन ग्राहक बसवलेला ‘लोखंड-पारा-लोखंड कोहरर’ ( iron-mercury iron coherer ) विकसित केला असल्याचे लंडनच्या रॉयल सोसायटीला पाठवलेल्या एका प्रबंधात म्हटले होते.

असे दिसते कीं मार्कोनीअगोदर बसूंनीच दूरस्थ बिनतारी संदेशवहनाचे प्रदर्शन केले होतें. रेडिओ लहरी पकडण्यासाठी (डिटेक्टर बनवण्यासाठीं) बसूंनीच सर्वात अगोदर उभयवाहकाचा म्हणजेच semiconductorचा वापर केला होता. शिवाय त्यांनीं आता सर्वसामान्य वापरात असलेल्या विविध प्रकारच्या सूक्ष्मलहरी देखील शोधून काढल्या होत्या. १९५४ मध्यें पीअर्सन आणि ब्रॅटेन यांनी रेडिओ लहरी संवेदक ग्राहक म्हणून सेमीकंडक्टरचा वापर सर्वप्रथम करण्याचा अग्रमान बसूंनाच दिलेला आहे. पुढील पन्नास वर्षांत मिलीमीटर सूक्ष्मलहरींवर कांहीहि संशोधन झाले नाहीं. १८९७ मध्ये त्यांनी आपण कलकत्त्यात मिलीमीटर सूक्ष्मलहरींवर केलेल्या संशोधनाबद्दल लंडनच्या रॉयल सोसायटीला माहिती दिली. त्यांनीं वेव्हगाईड्स, हॉर्न ऍंटेना, डायइलेक्ट्रीक लेन्सेस, विविध पोलरायझर्स एवढेच नव्हे तर सेमिकंडक्टर्सहि वापरले, तेहि ६० जीगॅहर्टझ्एवढ्या उच्च कंप्रतेला (frequency). त्यांच्या उपकरणापैकी बहुतेक अजूनही कलकत्त्यांतील बोस इन्स्टिट्यूटमध्यें शाबूत आहेत. एक १.३ मिलीमीटर मल्टीबीम रिसीव्हर आजहि अमेरिकेतील ऍरिझोना येथील एनआरएओ १२ मीटर टेलिस्कोपमध्यें कार्यरत आहे. त्यांच्या १८९७ मधील संकल्पना अजूनहि अमेरिका वापरते. १९७७ साली सेमीकंडक्टर विषयातील नैपुण्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवलेल्या सर नेव्हिल मॉट यांनी म्हटले आहे की जे. सी. बोस हे काळाच्या कमीत कमी साठ वर्षे पुढे होते आणि त्यांना पी-टाईप तसेंच एन-टाईप सेमीकंडक्टरच्या अस्तित्त्वाचा अंदाज आलेला होता.

यानंतर जगदीशचंद्रांनी वनस्पतीच्या शरीररचनाशास्त्राचा पाया घातला. १९२७ साली वनस्पतींत ‘जीवरस ऊर्ध्ववहना’ - ascent of sap - चा सिद्धांत त्यांनी मांडला. या सिद्धांताप्रमाणें जीवपेशीच्या विद्युत्चुंबकीय स्पंदनामुळे वनस्पतींत जीवरस - sap - खालून वरच्या दिशेने वाहतो. या सिद्धांतानुसार या वहनासाठी पेशींमधील विद्युत्चुंबकीय स्पंदनेच कारणीभूत होतात. आता ते डिक्सन आणि जॉली यांनीं १८९४ सालीं प्रथमच मांडलेल्या ताण-समाकर्षण - tension-cohesion - या लोकप्रिय सिद्धांताकडे संशयाने पाहूं लागले होते. १८९५ सालीं कॅनी याने मांडलेला सीपी सिद्धांत - Cp theory - या संशयाला पुष्टि देणारा होता. अंतस्वचेच्या सांध्यापाशी जीवपेशी पेशीरस कसा वाहून नेतात ते त्याने दाखवले.

विविध स्फुरकांना - स्टिम्यूलसना - वनस्पतींनी दिलेले प्रतिसाद मोजणारें क्रेस्कोग्राफ (Crescograph) नांवाचे नवीनच यंत्र बनवलें आणि वनस्पतींना प्राण्यांप्रमाणेच मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टीम) असते हे त्यांनी दाखवले. अशा रितीने त्यांनी प्राणीपेशी आणि वनस्पतीपेशी यांतील साम्य शोधून काढले. संगीतमय, आनंददायक वातावरणात वनस्पती वेगाने वाढतात आणि कर्कश आवाजाच्या कोलाहलात त्यांची वाढ खुंटते हे त्यांनीं दाखवून दिले. नंतर हे त्यांनी पद्धतशीर प्रयोगाने सिद्ध केले.

जीवभौतिकीमधील त्यांनी घातलेली मोलाची भर म्हणजे विविध स्फुरकांना -stimuli- (रसायनें आणि वनस्पतीला प्रयोगासाठी केलेले छेद किंवा जखमा) वनस्पतींनी दिलेल्या प्रतिसादाच्या वहनाचे (conduction) विद्युतीय स्वरूप. हे स्वरूप रासायनिक असावे असा त्यापूर्वी समज होता. त्यांचा हा दावा नंतर विल्डेन आणि सहकारी यांनी नंतर खरा असल्याचे सिद्ध केले. (नेचर, १९९२, ३६०, ६२-६५) वनस्पतीपेशींवरील सूक्ष्मलहरींचा परिणाम आणि तदनुषंगाने पेशीभित्तीतील विभवांतर (membrane potential) कसे बदलते, ऋतूप्रमाणें वनस्पतींत काय बदल होतात हे बदल कसे घडून येतात, या बदलांचे स्वरूप काय असते, वाढ रोखणारीं (inhibitor) रसायने, तपमान इत्यादींचे वनस्पतींवर काय आणि कसे परिणाम होतात याचा त्यांनी अभ्यास केला. विविध परिस्थितीत पेशीभित्तीतील विभवांतरात झालेल्या बदलाच्या अभ्यासावरून त्यांनी विविध वनस्पतीना वेदना होतात आणि माया समजते असा त्यांचा दावा होता.

१८९६ मध्ये त्यांनीं ‘निद्देशेर काहिनी’ ही तेव्हां अतिशय वाखाणली गेलेली विज्ञानकथा लिहिली. कुंतल किशोरी नांवाच्या केशतैलाच्या छोट्या बाटलीचा वापर करून वादळ शमवून हवामानावर ताबा मिळवण्याचा ‘प्रयोग’ त्यांत दाखवला होता. हीच कथा नंतर त्यांनी ‘पातालोक तुफान’ या नांवाने दुसरीकडे प्रसिद्ध केली.

कोणत्याहि शोधाचे हक्क घेण्याला त्यांचा असलेला विरोध जगजाहीर होता. आपल्या ‘कोहरर’ची रचना त्यांनी लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटमधल्या शुक्रवार सायंकाळच्या एका व्याख्यानात त्यांनी आपण बनविलेल्या कोहररची रचना उलगडून सांगितली. ‘द इलेक्ट्रिक इंजिनीअर’ने कोहररच्या रचनेत कोणतीहि गुप्तता न पाळल्यामुळें त्याचा व्यावहारिक वापर करून पैसे मिळविण्यास रान मोकळे असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. एका बिनतारी उपकरणे बनविणार्‍या उत्पादकाबरोबर भरघोस मोबदला देणार्‍या करारपत्रावर सही करायला त्यांनी नकार दिला. असे असले तरी सारा चॅपमन बुल या अमेरिकन मैत्रिणीच्या आग्रहाने म्हणा वा दबावामुळे म्हणा त्यांनीं ‘डिटेक्टर फॉर इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्सेस’ या एका उपकरणाच्या पेटंटच्या अर्जावर सही केली. ३० सप्टेंबर १९०१ रोजी हा अर्ज सादर केला आणि २९ मार्च १९०४ रोजी त्यांना अमेरिकन पेटंट क्र. ७५५८४० दिले गेले. ऑगस्ट २००६ मध्ये ‘आपण भविष्यकाळाचे काय देणे लागतो: डिजीटल युगांतील संकल्पना आणि तत्संबंधीची भूमिका (owing the future: ideas & Role in the digital age)’ या विषयावर दिल्लीत भरलेल्या एका परिषदेत आय आय टी दिल्लीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्स चे चेअरमन डॉ. व्ही एस राममूर्ती हे सर जगदीशचंद्र बसू यांच्या पेटंटविषयीच्या या दृष्टिकोनावर भर देतांना म्हणाले,

"पेटंट घेण्याच्या कोणत्याही पद्धतीबद्दलची त्यांची नाराजी सुप्रसिद्ध आहे. रविंद्रनाथ टागोरांना १७ मे १९०१ रोजी लंडनहून लिहिलेल्या पत्रात त्यांनीं तसे म्हटलेले आहे. पेटंट आणि पेटंटपासून मिळणार्‍या फायद्यांबद्दल ते अनभिज्ञ - unaware - होते असे नाही. अमेरिकेतील पेटंट (क्र. ७५५८४०) मिळवणारे ते पहिलेच भारतीय. पेटंटबद्दल जगजाहीर नाराजी असलेले जगात ते एकटेच नव्हते. विल्हेम रॉंटजेन ('क्ष किरण'वाला), पियरे क्यूरी, आणि इतर अनेकांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून विनापेटंट असलेली वाट चोखाळली होती."

३० नोव्हेंबर १९१७ रोजी बोस इन्स्टिट्यूटच्या स्थापनेच्या दिवशी केलेल्या उद्घाटनाच्या भाषणात जगदीशचंद्रांनी पेटंटविषयीचा आपला हा दृष्टिकोन नोंदवला आहे. पूर्णपणे वादातीत असे भारतीय मूळ असलेल्या बासमती तांदळाचे (टेक्ससवरून दिलेल्या टेक्समती या नावाचे) तसेच हळदीचे पेटंट फुकटात लाटू पाहाणार्‍या काही लोभी अमेरिकन लोकांपुढे ही नैतिक झळाळी प्रकर्षाने उठून दिसते.

बसू यांच्या इतिहासातील स्थानाचे मूल्य नव्याने ठरवण्यात आलेले आहे आणि बिनतारी संवेदक उपकरणाचे तसेच मिलीमीटर विद्युत्चुंबकीय लहरींच्या शोधाचे श्रेय आता त्यांच्या नांवावर मांडले गेले आहे आणि जीवभौतिकविज्ञांतील आदर्श म्हणून त्यांची आता गणना होते. त्यांची कित्येक उपकरणे १०० वर्षें उलटून गेलीं तरी अजूनही प्रदर्शनांत दाखविली जातात. यात विविध ऍंटेना, पोलरायझर्स आणि वेव्हगाईड्स येतात जी आजहि आधुनिक स्वरूपात वापरली जातात. १९५८ साली त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मशताब्दीपासून पश्चिम बंगालमध्ये विशेष शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे. आधुनिक विज्ञानातील त्यांचे योगदान हीच त्यांची ओळख आहे.

लेखक: सुधीर कांदळकर
(छायाचित्र महाजालावरून साभार)

५ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

काका, एकदम माहितीपूर्ण लेख. खूप आवडला !!

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

अप्रतिम लेख सुधीरजी !
शाळेत असताना फ़क्त त्यांच्या ’वनस्पतींनाही जीव असतो, आवडी निवडी असतात’ या संशोधनाबद्दल ऐकले होते. पण कधी खोलात जावून माहिती घेतलीच नव्हती. आता शोधेन, मिळेल ती सर्व माहिती काढून वाचेन. खुप खुप आभार या लेखाबद्दल.

सुधीर कांदळकर म्हणाले...

धन्यवाद.

Jyoti Kamat म्हणाले...

फारच छान, माहितीपूर्ण लेख. जगदीशचंद्रांबद्दल आतापर्यंत खूप कमी माहिती होती, या लेखामुळे ती कसर भरून निघाली. धन्यवाद!

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis म्हणाले...

लेख आजच वाचला. खूप माहितीपूर्ण आहे. पेटंट घेण्याला त्यांचा विरोध होता हे नव्यानेच वाचावयास मिळाले. लेखकाचे अभिनंदन